सिंचनाच्या पाण्याची प्रत आणि जमिनीवर होणारा परिणाम

सिंचनाचे पाणी हे शेती उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन असून त्याचे दुर्भिक्ष दिवसेंदिवस वाढतच आहे.  पाणी सर्व सजीव जीवन सृष्टीचे उगमस्थान आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून एक किलो शुष्क  जैव पदार्थ तयार करण्यासाठी वनस्पतीच्या प्रकारानुसार अंदाजे 200  ते 400 किलो पाणी आवश्यक ठरते.  शेतीमध्ये पाणी पिकासाठी वरदान तर आहेच,  परंतु त्याचा काळजीपूर्वक वापर न केल्यास ते पिकास व जमिनीला देखील मारकही ठरू शकते.  पीक उत्पादनात घट न होता पिकांना  वाढीच्या अवस्थेनुसार योग्य वेळी पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करणे हा सिंचनाचा प्राथमिक उद्देश आहे. तथापि वारंवार सिंचनाच्या पाण्यातून जाणारे क्षार हे जमिनीत जमा  होता व त्यामुळे पिकासाठी उपलब्ध पाणी कमी पडल्याने एकूण उत्पादनात व उत्पादकतेत घट दिसून येते.  पिकांचे फायदेशीर आणि यशस्वीरित्या उत्पादन घ्यावयाचे असल्यास अनुकूल हवामान, उत्कृष्ट बियाणे, सुपीक जमीन, खतांचा योग्य व संतुलित वापर, चांगल्या प्रकारची जमीन आणि उत्तम प्रतीचे  सिंचन पाणी (कमी क्षार असलेले) या बाबी अत्यंत महत्त्वाचे ठरतात.  सध्या महाराष्ट्र मधील केवळ 18 ते 19 टक्के क्षेत्र सिंचनाखाली दिसून येते. यामध्ये सिंचनासाठी विहिर,  बोरवेल,  शेततळे  तसेच धरणातील पाणी यांचा समावेश होतो.

धरणातून  कालव्यामध्ये येणाऱ्या पाण्याची प्रत नेहमी चांगलीच दिसून येते त्याचे कारण म्हणजे ते पाणी सतत वाहत असल्याने त्यामधील  क्षारांचे प्रमाण कमी दिसून येते. परंतु ज्या ज्या वेळेस धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील बोरवेल व सिंचन विहिरीतील पाणी पातळी वाढल्याचे दिसून येते. कालव्यातील पाणी जमिनीखालून झिरपून येत असल्याने त्यामध्ये विद्राव्य क्षारांचे प्रमाण जास्त दिसून येते व त्याचा अंतर्भाव बोरवेल व विहिरीतील पाण्यात दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये सिंचन पाण्याच्या अतिवापराने तथा अमर्यादित सिंचन पाण्याचा चिकन कणांचे प्रमाण जास्त असणाऱ्या जमिनीत वापरल्याने जमिनीची प्रत बिघडल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ वाढणाऱ्या खारवट, खारवट चोपण व चोपण जमिनीचे प्रमाण कालव्याद्वारे देण्यात येणाऱ्या पाणी क्षेत्रांमध्ये दिसून येते. ज्याप्रमाणे संतुलित रासायनिक खतांचा वापर करण्यासाठी माती परीक्षण करणे अत्यावश्यक ठरते अगदी त्याच पद्धतीने सिंचन पाणी परीक्षणाद्वारे कोणत्या प्रकारचे पाणी कोणत्या जमिनीसाठी तथा पिकासाठी उपयुक्त ठरू शकेल हे समजते. कारण एकाच प्रकारचे पाणी हलक्‍या व निचरा चांगला असणाऱ्या  जमिनीसाठी  उपयुक्त ठरू शकते तर भारी खोल चिकण कणांचे प्रमाण जास्त असणाऱ्या जमिनी साठी  अपायकारक ठरू शकते.  तसेच  चिकण कणांचे प्रमाण जास्त असणाऱ्या जमिनी मध्ये सिंचन पाण्याद्वारे सिंचन पाण्याद्वारे क्षार  साठण्याचे प्रमाण तुलनेने हलक्‍या व निचरा चांगल्या असणाऱ्या जमिनीपेक्षा जास्त दिसून येते.

सिंचन पाण्याची प्रत ठरविण्यासाठी ढोबळ परिमाणे 

  • ढोबळमानाने सिंचन पाण्याची प्रत ठरविण्यासाठी खालील बाबींचा समावेश  करता येऊ शकतो

  • सदरचे पाणी चवीला खारट अथवा मचूळ असल्यास

  • जमिनीला पाणी दिल्यानंतर जमिनीच्या वरच्या भागावर पांढऱ्या रंगाच्या क्षारांचा थर दिसून येतो.

  • पाणी दिल्यानंतर पिके काही प्रमाणात पिवळसर दिसून आल्यास

  • पीक उगवणीस अडचण आल्यास किंवा उगवलेल्या पिकांचे शेंडे करताना दिसून आल्यास

  • जमीन चिबड होऊन पाण्याचा योग्य निचरा न होता पाणी जमिनीच्या पृष्ठभागावर थांबत असल्यास

  • जमिनीवर चालताना पायाला कडकपणा जाणवत  असल्यास

परंतु उपरोक्त बाबी ह्या फक्त ढोबळमानाने असल्याने शास्त्रीय दृष्टिकोनातून सिंचन  पाण्याचे परीक्षण महत्त्वाचे ठरते.


सिंचन पाण्याची प्रत ठरविण्यासाठी शास्त्रीय परिमाणे 

शेतीसाठी  उपयुक्त असणाऱ्या सिंचन पाण्याची  प्रत ठरविण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून खालील प्रमाणे  चार परिमाणे उपयुक्त ठरतात.

  1. पाण्यात असणारे क्षारांचे प्रमाण किंवा क्षारता  (EC)

  2. सोडियम स्थिरिकरण गुणोत्तर (SAR)

  3. उर्वरित सोडियम कार्बोनेट (RSC)

  4. ठराविक अन्नद्रव्यांचा सिंचन पाण्यातील विषारीपणा (Specific ion toxicity)

उपरोक्त सिंचन पाणी परिमाणद्वारे जमिनीत किती प्रमाणात कोणते क्षार जातात व त्याचा  जमिनीवर होणारा विपरीत परिणाम तसेच  पिकावर  होणाऱ्या परिणामांचा अनुमान करता येऊ शकतो. त्याचबरोबर सिंचन पाणी तपासणी द्वारे आपल्याला कोणत्या प्रकारचे पाणी कोणत्या जमिनीवर व पिकासाठी उपयुक्त ठरू शकतो याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

  1. पाण्यात असणारे क्षारांचे प्रमाण:  क्षारता (Electrical Conductivity) 

या सिंचन पाणी तपासणी  मानका मध्ये  एकूण विद्राव्य क्षारांचे प्रमाण व त्याची सिंचनासाठी योग्यता  खालील तक्त्याच्या आधारे करता येऊ शकतो.

सिंचन पाण्यातील क्षारता  व एकूण विद्राव्य क्षारांचे प्रमाण यावर आधारित वर्गीकरण

वर्गीकरण

क्षारता 

(डेसी सायमन प्रति मीटर)

एकूण विद्राव्य क्षारांचे प्रमाण 

(मिलीग्राम प्रति लिटर)

उत्कृष्ट

0.25 व त्यापेक्षा कमी

160 व त्यापेक्षा कमी

चांगली

0.26  ते 0.75

166.4  ते 480

मध्यम

0.76  ते 2.00

480.4  ते 1280

खराब

2.01 ते 3.00

1280 ते 1920

सिंचनासाठी अयोग्य

3.00 व त्यापेक्षा अधिक

1920 व त्यापेक्षा अधिक


  1. सोडियम स्थिरिकरण गुणोत्तर (Sodium Adsorption Ratio)

या सिंचन पाणी मानका द्वारे सिंचन पाण्यामधील कॅल्शियम व मॅग्नेशियम च्या तुलनेने सोडियमचे प्रमाण किती आहे ते दिसून येते.  याबरोबरच  सिंचन पाण्याचे सोडियम स्थिरीकरण गुणोत्तर जास्त असल्यास सदर चे पाणी जमिनींना उपयुक्त दिसून येत नाही. कारण सोडियम मुळे जमिनीतील मोठ्या ढेकुळ कणांचे अलगीकरण लहान लहान मातीचे बारीक कणांमध्ये होऊन जमिनीतील सूक्ष्म पोकळ्यांमध्ये (Micropores) गेल्याने सच्छिद्रता कमी होते व त्यामुळे   एकूण घनता (Bulk density) वाढून एकंदर जमिनीत हवा खेळती राहण्याचे प्रमाण कमी होताना दिसते. यामुळे पिकांच्या किंवा वनस्पतींच्या मुळांची वाढ कमी होते, फायदेशीर जिवाणूंची संख्या घटते व एकंदर त्याचा परिणाम पिकांच्या पोषक अन्नद्रव्ये उपलब्धतेवर होतो.  सोडियम मुळे चिकन कणांच्या अलगीकरण द्वारे एकंदर जमिनीची भौतिक जडणघडण बिघडते.
खालील तक्त्यामध्ये पाण्याचे सोडियम स्थिरिकरण  उत्तरानुसार वर्गीकरण व उपयुक्तता दर्शविण्यात आली आहे.

वर्गीकरण

सोडियम स्थिरिकरण गुणोत्तर

उपयुक्तता

कमी सोडियम

0 ते 10

निचरा होणाऱ्या जमिनी साठी योग्य

मध्यम सोडियम

10 ते 18

हलक्या प्रतीच्या जमिनीसाठी योग्य परंतु चिकण कणांचे प्रमाण जास्त असणाऱ्या   खोल जमिनीसाठी घातक

जास्त सोडियम

18 ते 26

जास्त सोडियम च्या प्रमाणामुळे पिकांवर वाईट परिणाम दिसून येतात

अत्यंत जास्त  सोडियम

  26 पेक्षा जास्त

सिंचनासाठी  अयोग्य


  1. उर्वरित सोडियम कार्बोनेट (Residual Sodium Carbonate)

सिंचन पाण्याच्या  विम्लतेमुळे जमिनीवर होणारा घातक परिणाम हा उर्वरित सोडियम कार्बोनेट दर्शवितो. सिंचन पाण्यातील कार्बोनेटस व बायकार्बोनेट यांच्या  बेरजेतून,  कॅल्शियम व मॅग्नेशियम हे वजा  करून उर्वरित सोडियम कार्बोनेट काढल्या  जाते. चिकन कणांचे प्रमाण व धनप्रभार विनिमय क्षमता जास्त असणाऱ्या जमिनीस देण्यात येणाऱ्या सिंचन पाण्याची उपयुक्तता उर्वरित सोडियम कार्बोनेट मुळे ठरविता येऊ शकते. विद्राव्य सोडियमचे प्रमाण, कॅल्शियम व मॅग्नेशियम च्या तुलनेने  जास्त असल्यास सिंचन सदर पाण्याचा वापर चिकण कणांचे प्रमाण जास्त असणाऱ्या जमिनीवर केल्यास जमिनीची भौतिक जडणघडण बिघडते, तसेच जमिनीतील  अंतर्गत पाण्याची हालचाल कमी दिसून येते व त्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होतो. 

उर्वरित सोडियम कार्बोनेट च्या आधारावर सिंचन पाण्याची उपयुक्तता  खालील तक्त्यात दर्शविण्यात आलेली आहे.

वर्गीकरण

उर्वरित सोडियम कार्बोनेट    

  (मिली ईकवी/प्रति लिटर)

उपयुक्तता

चांगले

1.25 व त्यापेक्षा कमी

सिंचनासाठी योग्य

मध्यम

1.25  ते 2.50

सिंचनासाठी मध्यम योग्य

अयोग्य

2.50 व त्यापेक्षा अधिक

सिंचनासाठी अयोग्य


  1. ठराविक अन्नद्रव्यांचा सिंचन पाण्यातील विषारीपणा (Specific ion toxicity)

पाण्यात असणाऱ्या  ठराविक  आयन  किंवा मूलद्रव्याचे  प्रमाण जास्त असल्यास त्याचा ठराविक पिकांवर विषारीपणा ची लक्षणे दिसून येतात.  यामध्ये प्रामुख्याने क्लोराईड,  बोरॉन,  नायट्रेट इत्यादींचा समावेश होतो.

खालील तक्त्यामध्ये सिंचन पाण्यातील क्लोराईड व बोरॉन वर्गीकरण दर्शविण्यात आलेले आहे.

सिंचन पाण्यातील क्लोराइड चे वर्गीकरण

अनुक्रमांक

क्लोराइड चे प्रमाण  (पीपीएम)

वर्गीकरण

1

70 व त्यापेक्षा कमी

सर्वसाधारण सर्व पिकांसाठी सुरक्षित

2

70 ते 140

संवेदनशील पिके विषारीपणा ची लक्षणे दाखवतात उदाहरणार्थ मिरची तंबाखू स्ट्रॉबेरी

3

140 ते 350

मध्यम प्रतिकारक्षम पिके विषारीपणा ची लक्षणे दाखवतात उदाहरणार्थ द्राक्ष पालक वाटाणा टोमॅटो

4

350 व त्या पेक्षा जास्त

तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसून येतात


 सिंचन पाण्यातील  बोरॉन वर्गीकरण


अनुक्रमांक

बोरॉन चे प्रमाण  (पीपीएम)

वर्गीकरण

पिके

1

1.0

संवेदनशील

द्राक्षे,संत्री, लिंबू

2

2.0

मध्यम प्रतिकारक

बटाटा, मुळा, रताळी

3

4.0

प्रतिकारक

गाजर, कांदा, कोबी


सिंचन पाणी परीक्षणाद्वारे  सामू,  विद्युत वाहकता किंवा क्षारांचे प्रमाण, पाण्यातील एकूण विद्राव्य क्षार, त्यातील सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम व त्यांचे गुणोत्तर तसेच कार्बोनेटस, बायकार्बोनेट,सल्फेट्स व क्लोराइड चे प्रमाण काढता येऊ शकते. याबरोबरच एखाद्या मूलद्रव्याचे उदाहरणार्थ क्लोराईड, बोरन किंवा सोडियम चे प्रमाण जास्त असल्यास त्याबाबतची माहिती आपणास मिळू शकते. सिंचन पाणी तपासणी द्वारे त्या पाण्याची सिंचन पाण्यासाठीची  प्रत, त्यातील विविध क्षारांचे प्रकार व प्रमाण यांची जमिनीच्या प्रकाराशी  व  पिकासोबत  योग्य सांगड घातल्यास उत्पादन व  उत्पादकतेत निश्चित वाढ संभवते. कारण सिंचन पाण्यात विद्राव्य क्षारांचे प्रमाण अधिक असल्यास या पाण्याचे नियोजन व वापर आपल्याला हलक्‍या व निचरा चांगले असणाऱ्या जमिनीवर करून पिकांचे  अधिक उत्पादन घेता येऊ शकते. परंतु हेच पाणी     काल्या रंगाच्या जमिनीवर किंवा चिकट कणांचे प्रमाण जास्त  व खोल असणाऱ्या असणाऱ्या,  मध्यम निचरा असलेल्या जमिनीवर केल्यास उत्पादनात तर कमतरता येते परंतु मातीची जडणघडण बिघडणे, सच्छिद्रता कमी होणे, जमिनीची घनता वाढणे व कालांतराने खारवट होण्याचे प्रमाण दिसून येते. याबरोबरच सिंचन पाण्याचा अतिप्रमाणात वापर,  एकच पीक पद्धती,  सेंद्रिय खतांचा कमी वापर, पीक पद्धतीत हिरवळीच्या पिकाचा समावेश न करणे इत्यादी बाबींमुळे जमिनी खारवट होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.  याबरोबरच जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर  विपरीत आणि दीर्घ काळ परिणाम होऊन जमिनीच्या एकंदर  आरोग्य  घटताना दिसून येते दिसून येतो. 

अ) जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर होणारे

  • ज्या जमिनी खोल आहेत,  निचरा कमी व त्यामध्ये चिकन कणांचे प्रमाण जास्त असल्यास अशा जमिनीमध्ये सिंचन पाण्याद्वारे जाणारे क्षार व साठण्याचे प्रमाण हलक्‍या व निचरा चांगला असणाऱ्या जमिनीपेक्षा तुलनेने जास्त असते.

  • सिंचन पाण्यात सोडियमचे प्रमाण जास्त असेल तर एकजीव ढेकळंIचे  विलगीकरण अथवा अलगीकरण होऊन छोटे छोटे कण तयार होतात व त्यामुळे जमिनीची एकंदर सच्छिद्रता कमी होऊन माती घनतेत वाढ होते  त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहण्यास चे प्रमाण कमी होते. तसेच जमिनीतील अंतर्गत पाण्याची हालचाल मंदावते.

  • सोडियमचे क्षार व इतर क्षार जमिनीत जास्त प्रमाणात साठवल्यास एक प्रकारचा कठीण थर तयार होऊन जमिनी  कडक होतात व त्यामुळे पिकांची मुळे खोलवर जाण्यास अडचणी येतात.

  • जमिनीच्या वरच्या थरात कठीण कवच तयार झाल्याने पावसाच्या पाण्याने तथा सिंचनाच्या पाण्याने ही मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होते.

  • अशाप्रकारच्या जमिनीची मशागत करण्यासाठी  जास्त अश्‍वशक्तीची गरज भासते.  याबरोबरच पाणी निचरा होण्याचे प्रमाण कमी होते.

रासायनिक गुणधर्मावर होणारे परिणाम

  • सिंचन पाण्याद्वारे विद्राव्य क्षार जमिनीत साठवल्या जातात.

  • मातीचा सामू व विद्युत वाहकता किंवा क्षारता यामध्ये बदल दिसून येतो. बऱ्याचदा सिंचन पाण्यात विद्राव्य क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास  जमिनीतील क्षारता वाढल्याचे दिसून येते.

  • सिंचन पाण्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्यास जमिनीमध्ये सोडियमचे क्षार  वाढतात  व जमीन कालांतराने  चिबड होतात.

  • क्षार जास्त असणाऱ्या सिंचन पाण्याने जमिनीचा सामू विमलते कडे जाऊन पीक पोषक अन्नद्रव्ये उपलब्धतेवर परिणाम होतो.

  • सिंचन पाण्यातील सोडियम,  कॅल्शियम व मॅग्नेशियमचे प्रमाण जमिनीत वाढल्याने इतर अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होत नाहीत.

  • पिकांसाठी देण्यात आलेली रासायनिक खतांची कार्यक्षमता मंदावते.

  • सिंचन पाण्याचे प्रत योग्य असल्यास जमिनीचे एकंदर आरोग्य बिघडते शाश्‍वत उत्पादकतेस धोका उत्पन्न होतो.

  • कालांतराने क्षार जास्त असणाऱ्या सिंचन पाण्याच्या सततच्या वापराने जमिनी क्षारयुक्त आणि चोपन झाल्याचे दिसून येतात.

  • सिंचन पाण्याद्वारे सतत जमिनीत जाणाऱ्या क्षारांमुळे व त्यांच्या साठल्याने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते.

  • पिकासाठी पोषक अन्नद्रव्य उपलब्धता कमी होते, तसेच विविध अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे पिकांवर दिसून येतात.

जैविक गुणधर्मांवर होणारे परिणाम

  • क्षारयुक्त सिंचन पाण्यामुळे जमिनीचे जैविक गुणधर्म अथवा त्यामुळे होणारे जैविक बदल हे पिकांसाठी फारच मारक दिसून येतात.

  • उपयुक्त जिवाणूंचे जमिनीतील प्रमाण कमी होते यामध्ये प्रामुख्याने नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू उदाहरणार्थ रायझोबियमची कार्यक्षमता झपाट्याने कमी होते.

  • जमिनीतील कर्ब वायू व प्राण वायू यांचे प्रमाण बदलल्यामुळे  सूक्ष्म जीवजंतूची पैदास व त्यांचे कार्य मंदावते.

  • सिंचन पाण्यातील  क्षारांमुळे खारवट अथवा चोपण झालेल्या जमिनीतील हवा पाणी यांचे गुणोत्तर बिघडल्याने जमिनीतील जैविक घटकावर अतिशय विपरीत परिणाम होतो.

क्षारयुक्त सिंचन पाण्याचा पिकावर होणारा परिणाम

  • क्षारयुक्त सिंचन पाण्यामुळे जमिनीत बियांची उगवण कमी होते.

  • काही प्रमाणात उगवण झाल्यास पुढील  वाढीकरिता पाणी मुळांद्वारे शोषणासाठी अडचणी निर्माण होतात. तसेच उपलब्ध पाण्याचे प्रमाण अशा जमिनीमध्ये कमी असते.

  • क्षारयुक्त पाण्यामुळे मुळांची वाढ देखील मंदावते.

  • पाणी उपलब्धतेवर परिणाम झाल्याने पिकांना फुटवे येण्याचे प्रमाण देखील कमी होते.

  • एकंदरच पिकाच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते त्यामुळे पीक फुलोऱ्यात अथवा फळधारणा होणे यावर विपरीत परिणाम दिसून येतो.

  • अशा जमिनीवरील उत्पादित मालाची प्रत देखील चांगली येत नाही किंबहुना त्याचे टिकण्याचे प्रमाण देखील कमी झाल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ बटाटा, गाजर मुळा या पिकांवर परिणाम झाल्याचे दिसून येते.

क्षारयुक्त सिंचन  पाण्याचे व्यवस्थापन: 

आपल्याकडील असलेल्या सिंचन पाण्याच्या स्तोत्रा नुसार त्याचा वापर व नियोजन योग्य पद्धतीने केल्यास आहे त्या पाण्याचा चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो. कारण सिंचन पाणी तपासणीनंतर जर आपल्या सिंचन पाणी स्तोत्रांमधे क्षारांचे प्रमाण दिसून आल्यास त्याचे खालील प्रमाणे नियोजन करता येऊ शकते.

  1. जिप्समचा वापर

सिंचन पाण्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्यास त्याचा  जमिनीच्या एकंदर गुणधर्मावर परिणाम होतो. पाण्यातील  सोडियम चा घातक पणा कमी करण्यासाठी जिप्समचा वापर करण्यात येते. जिप्सम मधील कॅल्शियम हे चिकन कणावर चिकटलेल्या सोडियमला बाजूला करून त्या ठिकाणी जातो व सोडियम सल्फेट विद्राव्य क्षार तयार झाल्याने त्याचा जमिनीत निचरा सुलभ होतो. जिप्सम मधील कॅल्शियम हे सिंचन पाण्यातील  सोडियम मुळे जमिनीवर होणारा घातक पण  कमी करण्यास मदत करतो.  किती प्रमाणात जिप्सम टाकावा लागेल हे त्या सिंचन पाण्यातील सोडियम कॅल्शियम व मॅग्नेशियम यांच्या प्रमाणावर ठरविता  येते.

  1. पर्यायी सिंचन व्यवस्था

काही पिके उगवणीच्या काळात किंवा सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेत सिंचन पाण्यातील  क्षारासाठी संवेदनशील असतात, परंतु पुढील वाढीच्या कालावधीत ते काही प्रमाणात प्रतिकारक दिसून येतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळात म्हणजेच पेरणीनंतर लगेच चांगल्या प्रकारचे (क्षार कमी असलेले) सिंचन पाणी वापरल्यास त्याचा फायदा होतो तथापि पुढील वाढीच्या काळात मात्र नेहमीचे पाणी (क्षारयुक्त असलेले) वापरल्यास त्याची घातकता कमी करता येते.

  1. रासायनिक खतांचे व्यवस्थापन

रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढू शकेल अशी खते शक्यतो टाळावे. तसेच रासायनिक खते देताना ते अधिक बियाणांच्या किंवा पिकांच्या मुळाजवळ टाकू नये त्यामुळे तेथील क्षारता वाढून पिकांना हानी पोहोचू शकते. याबरोबरच रासायनिक खते कमी प्रमाणात वारंवार  सेंद्रिय खतांमध्ये मिसळून टाकल्यास त्यांचा  पिकांद्वारे कार्यक्षम वापर होऊ शकतो.

  1. सिंचन पद्धती

क्षारयुक्त सिंचन पाणी असेल तर तुषार सिंचन पद्धती उपयुक्त दिसून येत नाही कारण सिंचन पाण्यातील सोडियम व क्लोराइड चे प्रमाण जास्त असल्याने पिकांची पाने/ कडा/ शेंडे करपताना दिसून येतात. ठिबक सिंचन पद्धती क्षारयुक्त सिंचन पाण्यासाठी उपयुक्त दिसून येते.  तथापि ठराविक कालावधीनंतर ठिबक सिंचन संच आम्लयुक्त पाण्याने धून घेतल्यास फायदेशीर ठरते.

  1. पिकांची निवड

खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे काही पिके व त्यांच्या ठराविक जाती क्षार प्रतिकारक म्हणून घेता येऊ शकतात.

क्षार प्रतिकारक

मध्यम क्षार प्रतिकारक

कमी क्षार प्रतिकारक/ संवेदनशील

धैंचा ऊस (CoM 0265), लसूणघास  बार्ली

कपाशी ज्वारी मका बाजरी गहू

वाटाणा ताग हरभरा 


  1. पेरणी पद्धत

योग्य ती लागवडीची पद्धत, बेड चा आकार आणि सिंचन व्यवस्थापन यांची योग्य सांगड घातल्यास सिंचन पाण्यातील  क्षारामुळे होणारी दाहकता किंवा विषारीपणा कमी करता येऊ  शकतो. उदाहरणार्थ बियाणांची पेरणी अथवा रोपांची लागवड वरंब्याच्या पोटाला किंवा उतारावर केल्यास उगवण व सुरवातीची वाढ चांगली होते.

  1. क्षारयुक्त सिंचन पाण्याचा स्तोत्र आपल्याकडे  असल्यास जमिनीत निचरा अत्यावश्यक ठरतो जेणेकरून यामध्ये क्षार साठण्याचे प्रमाण कमी होईल.

  2. मल्चिंग किंवा आच्छादनाचा वापर केल्याने जमिनीतील दुय्यम खारवट पणाचा (Secondary salinization) विपरीत परिणाम कमी करता येऊ शकतात. जमिनीच्या वरच्या थरावर पीक अवशेषांचे आच्छादन अथवा मल्चिंग कागद याद्वारे जमिनीतून  होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग  मंदावतो  व त्यामुळे  पिकांच्या मुळा जवळील भागांमध्ये  क्षार कमी प्रमाणात साठतात.

  3. याबरोबरच  पीक पद्धती मध्ये  हिरवळीच्या पिकांचा अंतर्भाव उदाहरणार्थ ताग किंवा धैंचा,  शेणखत, सेंद्रिय खत, गांडूळ खत इत्यादींचा वापर करावा. 

  4. सिंचन पाण्याचे दोन स्तोत्रांची उपलब्धता असल्यास त्यामध्ये कमी क्षार असणारे या पाण्याचा वापर पेरणी किंवा सुरुवातीच्या  वाढीकरिता करण्यात यावा व त्यानंतर जास्त क्षार असणाऱ्या पाण्याचा वापर करता येऊ शकतो यामुळे सुरुवातीच्या काळातील क्षारांचे दुष्परिणाम कमी करता येऊ शकतो.



 सिंचनाच्या पाण्याचा प्रतिनिधी नमुना घेण्याची पद्धत

सिंचन पाणी परीक्षणाद्वारे शेतकरी बांधवांना आपल्या जमिनीचे व्यवस्थापन,  पिकांची निवड,  पीक पद्धतीचे नियोजन, उपलब्ध सिंचन पाणी स्तोत्राचे व्यवस्थापन, त्यातील असणाऱ्या क्षारांचे प्रमाण व प्रकार या बाबींचे नियोजन करून पीक उत्पादनात भर टाकता येऊ शकते. सिंचन पाण्याचे  प्रयोगशाळेत तपासणी खालील बाबींकरिता करण्यात येते.

सामू, क्षारता अथवा विद्युतवाहकता, कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड, सल्फेट,  कॅल्शियम, मॅग्नेशियम,सोडियम,पोटॅशियम,नायट्रेट. याबरोबरच सिंचन पाणी तपासणी अहवालावरून उर्वरित सोडियम कार्बोनेट व सोडियम स्थिरिकरण गुणोत्तर याची गणिती प्रक्रिया करून त्याद्वारे सिंचन पाण्याची प्रत व त्याची उपयुक्तता याबाबत  मृद शास्त्रज्ञ यांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.

तपासणीकरिता बोरवेल या सिंचन पाण्याच्या संसाधनाचा प्रातिनिधिक नमुना घेताना सदर बोरवेल तीस मिनिटे चालू ठेवून स्वच्छ बाटलीत पाणी नमुना साधारणपणे एक लिटर पर्यंत घ्यावा.तसेच विहिरीतून सिंचन पाणी नमुना घ्यावयाचा झाल्यास, तीस मिनिटे पाणी उपसा झाल्यानंतर तो घ्यावा. प्रातिनिधीक सिंचन पाणी नमुना ज्या बाटलीमध्ये घ्यावयाचा आहे त्याच पाण्याने  ती बाटली दोन-तीन वेळेस  धुऊन त्यानंतर त्यात पाणी नमुना भरावा.

सिंचन पाणी नमुना घेतल्यानंतर त्यावर ज्या क्षेत्रावर सिंचन पाणी वापरण्यात येते त्या क्षेत्राचा सर्वे क्रमांक, गट क्रमांक, शेतकऱ्याचे नाव, नमुना घेतल्याचा दिनांक, आणि ज्या  सिंचनस्तोत्रातून पाणी नमुना घेण्यात आलेला आहे तेथील जवळची खूण त्या बाटलीवर लिहून प्रयोगशाळेत पाठवावा.

सिंचन पाणी नमुन्याचे परीक्षण, मृद विज्ञान व कृषी रसायन शास्त्र, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर पुणे येथे करता येऊ शकेल.



क्षारयुक्त जमीन







क्षार प्रतिकारक पिके

लसूणघास

 धैंचा






मध्यम क्षार प्रतिकारकपिके

कपाशी 

  गहू



क्षार संवेदनशील पिके

वाटाणा 


हरभरा   



सिंचन पाण्यातील क्लोराईड व  बोरॉन यांची द्राक्ष पिकावर विषारी पणाची लक्षणे

क्लोराईड


बोरॉन

  



डॉ. आनंद जाधव  व  डॉ. अभय पाटील 

मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र,

कृषी महाविद्यालय,  पुणे

Post a Comment

Previous Post Next Post