गांडूळ खत म्हणजे काय?

          देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता एकूण 130 दशलक्ष लागवडीखालील असणाऱ्या क्षेत्रातून अन्नधान्याची पूर्तता करण्याकरिता आजच्या घडीला हेक्टरी उत्पादन उत्पादकता वाढविणे अनिवार्य आहे. अन्नधान्य उत्पादन वाढीकरिता हरितक्रांती द्वारे आपण आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेलो आहोत.परंतु यामुळे जमिनीची सुपीकता आरोग्य खालावल्याचे दिसून येते. रासायनिक खतांचा असंतुलित वापरमाती पाणी परीक्षण  याबाबत दिसून येणारी अनास्था, बेसुमार अमर्यादित सिंचन पाण्याचा वापर, सेंद्रिय खतांचा होणारा अत्यल्प वापर, हिरवळीच्या पिकांचा समावेश नसलेली पीक पद्धतीवाढत्या प्रमाणात विविध पिकावर वेगवेगळ्या अन्नद्रव्य कमतरतेची मोठ्या प्रमाणात दिसून येणारी लक्षणेवाढते क्षारयुक्त जमिनीचे प्रमाण इतर अशा अनेक कारणामुळे जमिनीचे भौतिक रासायनिक जैविक गुणधर्मांची अपरिमित हानी होत आहे त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुपीकता दिवसागणिक कमी होताना दिसते. या सर्वांचा परिणाम जमिनीत असणाऱ्या फायदेशीर जीवांची संख्या त्यांचे कार्य कमी होताना दिसते. तसेच जमिनीमधील जिवाणूंची संख्या, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण व सेंद्रिय अमलक कमी झाल्यामुळे जमिनीचा सामू बिघडलेला दिसतो. या सर्वांमुळे अन्नद्रव्य उपलब्ध होण्याची क्रिया मंदावते तसेच जमिनीची उत्पादकता कमी होऊन उत्पादन क्षमता घटते.

गांडूळ खत म्हणजे काय?

  जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी घेण्यात येणाऱ्या पिकाकरिता माती परीक्षणावर आधारित  संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे अत्यंत गरजेचे आहे.  याबरोबरच पिकांना आवश्‍यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना साधारणपणे रासायनिक खतांमधून 40-45  टक्के,  सेंद्रिय पदार्थातून ( शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत इत्यादी)20-25 टक्के तर उर्वरित 20-25  टक्के जैविक खताचा द्वारे एकात्मिक रित्या दिल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा तर होतेच शिवाय उत्पन्न देखील  वाढते.  एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन मध्ये जमिनीत घातलेल्या अन्नद्रव्याचा पिकांसाठी कार्यक्षम वापर होतो


गांडूळांना शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो कारण मातीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक मापदंडांवर गांडुळांचा खूप सकारात्मक परिणाम होतो. गांडुळ हा मृदा जैवतंत्रज्ञ आणि घनकचरा व्यवस्थापक आहे. गांडुळे मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कचरा किंवा कचरा वापरतात आणि त्यांचे खतामध्ये रूपांतर करतात. गांडूळे ही जमिनीमध्ये राहु सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात त्यांच्या मला मूत्राद्वारे महत्वाचे आवश्यक सेंद्रिय आणि जैविक पदार्थ मिसळतात आणि त्यांच्या हलचाल प्रणालीद्वारे मातीची रचना सुधारतात.  सेंद्रिय पदार्थांचा पुनर्वापर, मातीची रचना, मातीची सुपीकता, उत्पादकता, शेती यासह मातीचे आरोग्य आणि सेंद्रिय कचरा व्यवस्थापनात त्यांचा उपयोग यामधील त्यांचे महत्त्व चांगलेच प्रस्थापित झाले आहे. त्यामुळे गांडुळ हे मातीचे पुनरुज्जीवन करण्यात अग्रेसर मानले जाते. तथापि, गांडुळे त्यांच्या कामात एकटे नाहीत. ते फायदेशीर जीवांच्या गटातील एक आहेत, जे माती सुधारतात. मातीचे आरोग्य राखण्यासाठी अनेक सूक्ष्मजीव आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या एक मोठा समुदाय गांडुळांमध्ये सामील होतो. तथापि, गांडुळांची उपस्थिती मातीच्या आरोग्याचे सूचक आहे. गांडुळे म्हणजे मातीची नाडी. नाडी जितकी निरोगी, तितकी माती निरोगी.

 

गांडूळ खत म्हणजे काय?


गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा  म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा व्हर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापकी स्वतच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्वाचा घटक आहे.


गांडुळाचा जीवनक्रम: 


गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्ल्यावस्था आणि पुर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थासाठी ओलसर जमीन अर्धवट कुजलेले सेंद्रीय पदार्थ  असणे आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरूष जनन असे दोन्ही ही अवयव असतात. गांडुळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी देतात. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था सर्वसाधारण 7 ते 20 दिवसांची असते. गांडुळाची अपुर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील 2 ते 3 सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे  पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये लक्षण होय. साधारणपणे गांडूळाचे आयुष्य दोन ते अडीच वर्षाचे असते त्यांची लांबी साधारणपणे 10 ते 15 सेंटीमीटर पर्यंत  तर वजन दीड ते चार ग्रॅम पर्यंत  असू शकते

 

गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ:

 

शेती-पिकांचे अवशेष: पेंढा, ताटे, कोंडा, पालापाचोळा आणि गवत .

भाजीपाला,  फळ प्रक्रिया  इत्यादी पासून निघणारा सेंद्रिय पदार्थ.

आळंबीची काढणी झाल्यानंतर चे उर्वरित कंपोस्ट

जनावरांपासून मिळणारे ; शेण, मूत्र, शेळ्या लीद, कोंबड्यांची विष्ठा,

फळझाडे आणि वनझाडांचा पालापाचोळा 

हिरवळीची खते : ताग, धैंचा, गिरीपुष्प, शेतीतील तण

घरातील केरकचरा : उदा. भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, शिळे अन्न .

सेंद्रिय पदार्थ कुजण्यासाठी पद्धत

प्रथमता आपल्याकडील उपलब्ध जागेनुसार कंपोस्टिंग करण्यासाठी दोन मोठ्या आकारमानाचे खड्डे करावे. (लांबी 10 फूट x  रुंदी 10 फूट x  खोली 5 फूट).

या खड्ड्याच्या तळाशी सेंद्रिय पदार्थांचा (उदाहरणार्थ झाडाचा पालापाचोळा शेतातील पिकांचे अवशेष भाताचा पेंढा गव्हाचा कोंडा इत्यादी) दहा इंचापर्यंत चा एक थर खालच्या  द्यावा

त्यानंतर या थरावर 100 लिटर पाण्यात 40 किलो शेण एक किलो सेंद्रिय पदार्थ कुजविणारे जिवाणू यांचे एकजीव मिश्रण करून त्यावर सारख्या प्रमाणात शिंपडावे.

याबरोबरच कुजण्याची सेंद्रीय पदार्थ कुजण्याची क्रिया जलद गतीने होण्यासाठी प्रति टन सेंद्रिय पदार्थांत करिता आठ किलो युरिया,  दहा किलो सिंगल सुपर फॉस्फेट या रासायनिक खताचा वापर करावा जेणेकरून सेंद्रिय पदार्थाचे कर्ब नत्र प्रमाण कमी होईल.

साधारणपणे पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने या खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांचे  थर  वर खाली करणे आवश्यक असते कारण त्यामुळे  ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने जीवाणू द्वारे कुजण्याची क्रिया जलद होण्यास मदत होते.

कुजण्याची प्रक्रिया चालू असताना कंपोस्ट  खड्ड्यामध्ये 45 ते 50 टक्के ओलाव्याचे प्रमाण आवश्यक ठरते.

या कंपोस्ट खड्ड्यामध्ये  सेंद्रिय पदार्थांचे 30 ते 35 दिवस कुजण्याची प्रक्रिया झाल्यानंतर त्याचा वापर  गांडूळ खत तयार करण्यासाठी करावा.

 

गांडूळ खताचे बेड भरण्याची पद्धत

 

1.  HDPE व्हर्मिबेड असतील तर समांतर पातळीवर बांबूच्या साह्याने त्यांना व्यवस्थित बसवून घ्यावे. व्हर्मिबेड मधून झिरपणाऱ्या पाण्यासाठी असलेले छिद्र उतारा कडील बाजूस येईल याची दक्षता घ्यावी.
2. गांडूळ खत तयार करण्यासाठी कायमस्वरूपी सिमेंटचे बेड देखील करता येऊ शकतात (लांबी 3 मीटर, रुंदी 1.5 मीटर आणि खोली 60 सें. मी.) ठेवावी
3. व्हर्मिबेडच्या किंवा सिमेंटचे बेडच्या खालच्या किंवा तळाशी पिकांचे अवशेष झाडांचा पालापाचोळा यांचा साधारणपणे सहा ते आठ इंच जाडीचा थर द्यावा.

4. या थरावर से शेणकाला याचा थर द्यावा. शेणकाला (Cow dung slurry) तयार करण्यासाठी 100 लिटर पाण्यामध्ये 40 किलो शेण एक किलो सेंद्रिय पदार्थ कुजविणारे जिवाणू वापरावे.

5. यानंतर आठ ते दहा इंच जाडीचा अर्धवट कुजलेल्या कंपोस्ट खताचा थर देण्यात यावा.  या क्रमाने पद्धतीने थरावर थर देऊन सबंध व्हर्मिबेड किंवा सिमेंट-बेड भरून घ्यावा

6. साधारणपणे 15 ते 20 दिवसानंतर दोन ते तीन किलो गांडूळे वरच्या थरावर सोडावे.  गांडूळे सोडल्यानंतर ते खालच्या थरांमध्ये प्रवेश करतात त्यानंतर त्यावर पूर्णपणे झाकेल असे गोणपाट टाकून त्यामध्ये 50 टक्के पर्यंत ओलावा राहील याची काळजी घ्यावी.

7. दोन ते अडीच महिन्यानंतर रवाळ करड्या रंगाचे उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होईल.  गांडूळ खत तयार होण्याचा कालावधी हा त्यात वापरलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या कर्ब नत्र प्रमाणावर अवलंबून असतो


गांडूळ खताचे फायदे:

 

1. गांडूळ खतामध्ये पिकाच्या वाढीसाठी आवश्यक मुख्य सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रित उपलब्ध असतात. गांडूळ खतामुळे जमिनीची भौतिक सुपिकता टिकून राहते.

2. गांडूळ खतामधील अन्नद्रव्ये पिकाला आवश्यक अशा स्वरूपात उपलब्ध असतात. त्यामुळे झाडांची मुळे ती सहजपणे घेऊ शकतात.

3. गांडुळाच्या पचनसंस्थेत अनेक सूक्ष्मजीव असतात. ते अन्नपदार्थामध्ये मिसळले जातात विष्ठेसोबत येतात. या सूक्ष्मजीवांमुळे रोगनिर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा नाश होतो पिकावर येणारी रोगराई कमी होते

4. गांडूळ खतामुळे जमीन भुसभुशीत राहते, त्यामुळे जमिनीत हवा पाणी खेळते राहते पिकांची वाढ अधिक वेगाने होते.

5. गांडूळ खतामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो जमिनीची जलधारण क्षमता वाढते.

बागायती पिकांबाबत सिंचनाचा खर्च कमी होतो पाण्याची बचत होते..

6. गांडूळ सेंद्रिय पदार्थ अधिक प्रमाणात खाते त्याचे रूपांतर खतात करतो. शेतकरी त्याच्याकडे असलेल्या प्रचंड काडी कचरा, पालापाचोळा बऱ्याचदा फेकून देतो जाळून टाकतो. त्यापासून गांडूळ खत तयार होऊ शकते.

गांडूळ खतामधील उपलब्ध असलेले अन्नद्रव्याचे प्रमाण

अनुक्रमांक

घटक

प्रमाण

1

  सामू [1:10]

7.25  ते 7.50

2

विद्युत वाहकता [डेसी सायमन प्रति मीटर]

  8.5 ते 9.5

3

नत्र [%]

1.70 ते 1.90

4

स्फुरद [%]

0.7 ते 0.9

5

पालाश [%]

1.05 ते 1.10

6

कर्ब: नत्र प्रमाण

20:1

7

लोह [पी पी एम]

3500 ते 4000

8

  जस्त [पी पी एम]

95 ते 120

9

मंगल [पी पी एम]

410 ते 480

10

तांबे [पी पी एम]

40 ते 55

 

Post a Comment

Previous Post Next Post